Ticker

6/recent/ticker-posts

बहादूरवाडी चा भुईकोट - Bahadurwadi म्हणजे बहादुरगड ( धर्मवीरगड ) नव्हे | जाणून घ्या सर्व माहिती

बहादूरवाडी चा भुईकोट - Bahadurwadi म्हणजे बहादुरगड ( धर्मवीरगड ) नव्हे 


बहादूरवाडी हा पूर्वीच्या पन्हाळा प्रांतातील एक भुईकोट आहे. सध्या हा भुईकोट सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. घोरपडे घराण्याची सत्ता असणारा हा प्रदेश आणि तिथं बांधलेला हा भुईकोट वारणा नदीच्या पलीकडून होणाऱ्या कुरघोड्या रोखण्यासाठी मोक्याची जागा होती.


दुसरी तटबंदी


सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आज रोजी राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. जसं राजकारण तसेच इतिहास पण या तालुक्याने गाजवला आहे. मच्छिंद्रगड, कैलासगड, बहादूरवाडी या सारख्या किल्ल्यांनी वाळवा तालुक्याचे योगदान इतिहासात नोंदवलेले दिसते.



दुसरा दरवाजा



बहादूरवाडी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर पासून १६ किमी अंतरावर आहे. तो एक छोटा आणि मजबूत भुईकोट आहे. अंदाजे १०फूट रुंदीचा व १५ फूट खोलीचा खंदक असून त्याच्या पुढे तटबंदी आहे. या तटबंदीच्या आत अजुन एक तटबंदी असून तिला ८ बुरुज आहेत. जास्तीतजास्त बांधकाम हे भाजीव विटांपासून केलेले दिसते. पहिल्या दरवाजातून आत जाताना शेजारी देवडीत काळ्या पाषाणातील गणपती दिसतो. तिथून आता गेलं की दुसरी तटबंदी लागते. या तटबंदीत चार खोल्या आहेत ज्या बहुधा घोड्यांसाठी आहेत. या तटाच्या आत जाण्यासाठी वक्राकार दरवाजा असून आतमध्ये वाड्याचे अवशेष आणि बांधीव विहीर आहे. किल्ल्यात गवत आणि काटेरी झुडपे यांचे रान माजलेले दिसते.




तटबंदी मध्ये जंग्या ची व्यवस्था उत्तम आहे. एका जंगीतून पाहिलं की आत मध्ये परत ५-६ वेगवेगळ्या दिशांना जंग्या आहेत.


जंग्या






इथेच शेजारी बागणी नावाचा अजुन एक भुईकोट आहे जो जवळजवळ नामशेष झाला आहे. याचा एक बुरुज, थोडी तटबंदी आणि खंदक शिल्लक आहे.


बागणी किल्ल्याचे अवशेष


इतिहास
याच बांधकाम पेशवे कालीन आहे हे रचना आणि बांधणी बघून लक्षात येत. पण इतिहास मात्र १६ व्या शतकात घेऊन जातो. वाळव्यातील देशमुखीचे उल्लेख सोळाव्या शतकापासून मिळतात. बहादूरवाडी ची देशमुखी नक्की कुणाची यावर बरेच वाद पुढील काळात झाले. माने, शिंदे, घोरपडे ही तीन घराणी बहादूरवाडी च्या देशमुखी करीता वाद करत होती.


विहीर


इसवी सन १७२३ चे एक पत्र आहे ज्यात इथल्या मोकादमाला पंतप्रतिनिधींनी समज दिली आहे की  बहादूरवाडी, वाळवा, कामेरी अशा १५ गावांची देशमुखी गंगाबाई देशमुख हिच्या कडे चालत आहे ती कायम ठेवावी व त्यात व्यत्यय आणु नये. १७२७ मध्ये श्रीनिवास शंकर प्रतिनिधी यांनी संताजी घोरपडे (सरसेनापती नव्हे) यांना पत्र लिहिले ज्यात ते म्हणतात की बहादूरवाडी आपणास इनाम आहे त्याची रक्कम माफ केली आहे तरी वसुलाचा तगादा गावास लागणार नाही याची काळजी घ्या.


पहिल्या दरवाज्यात असणारा गणेश



पुढे १७३६ मध्ये रायाजी व हेगोजी माने यांच्या वाळवा वतनासाठी वाद झाला त्यात शाहू महाराजांनी वाळव्याची विभागणी करून बहादूरवाडी हे वतन हेगोजी मान्याकडे दिले. १७५२ साली या वतनात दखल केली म्हणून घोरपडे ला समज दिली गेली. १७६४ साली माधवरावांनी महिपतरव घोरपडे याकडे असणारे बहादूरवाडी हे गाव जप्त केले. काही काळाने गाव परत केला पण गोपालजी भोसले याला बहादूरवाडीला पाठवून महीपतराव याचा वाडा पडायची आज्ञा केली व त्याला चार दिवळीचे घर बांधून राहायला सांगितले. हे देखील सांगितले की जिथे राहाल तिथे खंदक खणू नये.






वाळवा भागातील या कुरघोड्या किती जास्त प्रमाणात होत्या हे वरील प्रकरणावरून समजते. आज देखील बहादूरवाडी मध्ये भुईकोट आणि आजूबाजूचा प्रदेश याला धरून हेवेदावे सुरू आहेत.



तटबंदी आणि खंदक



देवड्या



खंदक

©ओंकार खंडोजी तोडकर

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. माननीय ओंकार जी तोडकर,
    आपला ब्लॉगस्पॉट वाचला खूपच आवडला.
    अशीच नवनवीन माहिती मिळत राहावी ही विनंती.

    तसेच आपणास विनंती आहे की आपल्या सांगलीच्या
    ग्रुप वर जॉईन करून तिथे आपण आपल्या ब्लॉग बद्दल माहिती द्यावी जेणेकरून ब्लॉग बद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल,
    ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी लिंक शेअर करत आहे.
    आभारी आहोत.


    https://www.facebook.com/groups/3019872994715087/permalink/3020246044677782/

    उत्तर द्याहटवा